No-confidence motion : संसदेत सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेत सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
ओम बिर्ला यांना पदावरून हटविण्याच्या उद्देशाने काँग्रेस, द्रमुक आणि समाजवादी पक्षासह सुमारे १०० हून अधिक विरोधी खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. काँग्रेस नेते के. सुरेश, गौरव गोगोई आणि मोहम्मद जावेद यांनी अविश्वास प्रस्तावाची सूचना दिली. मात्र, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली नाही. संसदीय लोकशाहीच्या प्रतिष्ठेचा विचार करता विरोधी पक्षनेत्याने सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करणे योग्य नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ठराव संविधानाच्या कलम ९४(क) अंतर्गत मांडण्यात आला असून लोकसभेचे कामकाज “स्पष्टपणे पक्षपाती पद्धतीने” चालविल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नसल्याने हा मूलभूत लोकशाही अधिकाराचा भंग असल्याचा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे.
तसेच, धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना भाषण पूर्ण करू न देणे आणि आठ विरोधी खासदारांचे निलंबन यांसारख्या अलीकडील घटनांचाही प्रस्तावात उल्लेख आहे. लोकसभेत दीर्घकाळ सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी हे पाऊल उचलले आहे. नोटीस सुपूर्द केल्यानंतर ओम बिर्ला सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाले नसल्याची माहिती मिळाली आहे.

