the bribe-takers have been punished : भारत निर्माण अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करून देण्यासाठी २००८ मध्ये २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील दोन कर्मचाऱ्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पाच वर्षांची सक्त मजुरी व प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

वाशिम : भारत निर्माण अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करून देण्यासाठी २००८ मध्ये २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील दोन कर्मचाऱ्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पाच वर्षांची सक्त मजुरी व प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणातील आरोपी सुभाष मोतीराम इंगळे (सहायक लेखा अधिकारी, वर्ग–३) व निलेश मधुकर लंगोटे (कनिष्ठ सहायक, वर्ग–३) हे दोघे २००८ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वाशिम येथे कार्यरत होते. तक्रारदार (वय ४२) यांच्या गावासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा निधी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात दोन्ही आरोपींनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. यातील १७ हजार रुपये त्यांनी सुरुवातीला स्वीकारले होते. उर्वरित ३ हजार रुपये स्वीकारताना ३० मे २००८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर ३१ मे २००८ रोजी वाशिम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
१७ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल देताना जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सुभाष इंगळे व निलेश लंगोटे यांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अन्वये चार वर्षांची शिक्षा व २५ हजार रुपये दंड, तसेच कलम १३ अंतर्गत पाच वर्षांची सक्त मजुरी व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. एकूण प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. श्रीराम नारायण काळु यांनी कामकाज पाहिले. न्यायालयीन पैरवीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक जगदीश परदेशी तसेच पोलिस कर्मचारी समाधान मोघाड, उज्वला गायकवाड आणि सतीश गुळदे यांनी सहकार्य केले.
लाच मागितल्यास तक्रार करा!
शासकीय किंवा निमशासकीय काम लवकर करून देण्याच्या नावाखाली कोणी लाच मागत असल्यास संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर किंवा वाशिम जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

