District Collector :‘ विकसित भारत–२०४७ च्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जावे, यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी एकजुटीने ‘आत्मनिर्भर बुलढाणा’ घडवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

बुलढाणा : विकसित भारत–२०४७ च्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जावे, यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी एकजुटीने ‘आत्मनिर्भर बुलढाणा’ घडवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता-वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले की, भारत आज परिवर्तन, प्रगती व आत्मविश्वासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश तर आहेच, पण जागतिक अर्थव्यवस्थेतही अग्रस्थानी वाटचाल करत आहे. महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून बुलढाणा जिल्हाही या विकासयात्रेत आत्मविश्वासाने पुढे जात आहे. शेती, उद्योग, शिक्षण, सहकार, डिजिटल सेवा, महिला सक्षमीकरण व युवक विकास या क्षेत्रांत जिल्हा उल्लेखनीय प्रगती करत आहे.
पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड गरजेची
जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ७ लाख २९ हजार हेक्टर, तर रब्बी हंगामात ३ लाख ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप व रब्बी हंगामात विविध पिकांचे समाधानकारक उत्पादन झाले असून पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मनरेगा व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत २२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली असून चालू वर्षी आणखी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ४२९ कोटींची मदत
अतिवृष्टी, पूर, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासन खंबीरपणे उभे आहे. सन २०२५-२६ मध्ये ६ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी ५६२ कोटी रुपये मंजूर करून ६ लाख ४० हजार शेतकऱ्यांना ४२९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी ७०२ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे.
अॅग्रीस्टॅक अंतर्गत ४ लाख ८४ हजार शेतकरी ओळख क्रमांक तयार झाले असून उर्वरित शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी उपक्रमात ८० हजार हेक्टरवरील नोंदी पूर्ण झाल्या आहेत.
जिगाव सिंचन प्रकल्प, लोणार सरोवर संवर्धन
जिगाव सिंचन प्रकल्पासाठी २२०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण होऊन शेतकऱ्यांना १६०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आयआयटी मुंबईच्या सहकार्याने संशोधन सुरू असून पर्यटन विकासालाही चालना दिली जात आहे.
निर्यातीत बुलढाणा अव्वल
रोजगार निर्मिती योजनेंतर्गत ८२९ उद्योगांना मंजुरी मिळून ६१२ उद्योग सुरू झाले आहेत. मागील वर्षी जिल्ह्यातून ८७४ कोटी रुपयांची निर्यात झाली असून अमरावती विभागात जिल्हा प्रथम व राज्यात चौथा क्रमांक मिळाला आहे. चालू वर्षात १५०० कोटी रुपयांच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
युवकांनी नोकरी देणारे बनावे
युवकांना संबोधित करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, अॅग्री-स्टार्टअप्स व ई-कॉमर्समध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत. युवकांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
डिजिटल प्रशासनाला गती
‘महसूल मित्र – सुलभ व्हॉट्सॲप चॅटबॉट’, ‘पुनर्भू – भूसंपादन प्रणाली’ अशा डिजिटल सेवांमुळे नागरिकांना सेवा सुलभपणे उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस दलाच्या कार्याचे कौतुक
बुलढाणा पोलिसांनी ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत गुन्हेगारीत १० टक्के घट व ८० टक्के गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.
मुख्य ध्वजारोहणानंतर पोलीस परेड, पथसंचलन, विद्यार्थ्यांच्या सामूहिक कवायती व अंमली पदार्थविरोधी जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

