fifth day itself : रूढी-परंपरा व अंधश्रद्धेला फाटा देत अंत्यसंस्कारानंतर पाचव्या दिवशीच रक्षाविसर्जन, सर्व धार्मिक विधी पूर्ण करून वृक्षारोपण करण्याचा पुरोगामी निर्णय घेत भानुसे परिवाराने समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा येथील ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

रक्षाविसर्जनानंतर वृक्षारोपण; भानुसे परिवाराने घालून दिला नवा सामाजिक आदर्श
देऊळगाव राजा : रूढी-परंपरा व अंधश्रद्धेला फाटा देत अंत्यसंस्कारानंतर पाचव्या दिवशीच रक्षाविसर्जन, सर्व धार्मिक विधी पूर्ण करून वृक्षारोपण करण्याचा पुरोगामी निर्णय घेत भानुसे परिवाराने समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा येथील ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
विझोरा येथील प्रतिष्ठित नागरिक, माजी सरपंच नारायणराव सखाराम भानुसे यांच्या पत्नी तथा सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक व व्याख्याते डॉ. शिवानंद नारायणराव भानुसे यांच्या मातोश्री चंद्रलेखा नारायणराव भानुसे (वय ६९) यांचे दि. १७ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी अत्यंत साध्या पद्धतीने जिजाऊ वंदना सादर करून पार पाडण्यात आला.
यानंतर पारंपरिक १३–१४ दिवसांच्या प्रथेला छेद देत, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी म्हणजेच पाचव्या दिवशीच रक्षाविसर्जनासह सर्व विधी पूर्ण करण्यात आले. यावेळी गोडजेवणानंतर वृक्षारोपण करून दिवंगत मातोश्रींच्या स्मृती जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले की, जुन्या परंपरेमुळे नातेवाईक, भाऊबंद व सगेसोयरे अनेक दिवस अडकून पडतात. लग्न, कौटुंबिक व महत्त्वाची कामे स्थगित करावी लागतात आणि अनेकजण आर्थिक व मानसिक अडचणीत सापडतात. हे योग्य नाही. त्यामुळे चौथ्या-पाचव्या दिवशीच सर्व विधी पूर्ण करणे समाजासाठी अधिक व्यवहार्य व मानवतावादी आहे.
या विचारांना नारायणराव भानुसे, भगिनी शिवगंगा सुभाष म्हस्के, शिवकन्या दिनेश पडघान, सुशीला अशोक नरवाडे, काका भगवान सखाराम भानुसे, काकू सुनीता भगवान भानुसे यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांनी दुजोरा दिला. त्यामुळे सर्वांना सोयीचा, आधुनिक व पुरोगामी असा निर्णय येथे प्रत्यक्षात राबविण्यात आला.
यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, आजी-माजी मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षांसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचक्रोशीसह संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातून नातेवाईक-मित्रपरिवारही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
डॉ. शिवानंद भानुसे यावेळी म्हणाले, “जोपर्यंत व्यक्ती जिवंत असते तोपर्यंत तिची काळजी, प्रेम व जपणूक करणे हेच खरे महत्त्वाचे आहे. व्यक्ती गेल्यानंतर रूढींच्या नावाखाली लोकांना अडचणीत आणण्यापेक्षा चौथ्या किंवा पाचव्या दिवशी विधी पूर्ण करून त्यांच्या स्मृतीसाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे.”भानुसे परिवाराच्या या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला असून, अंधश्रद्धा दूर करून मानवी मूल्यांना प्राधान्य देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

