394 quintals of sorghum returned : गोदामांमधून स्वस्त धान्य दुकानांपर्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य पाठविले जात असल्याची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी आक्रमक भूमिका घेत थेट वाटप थांबविले. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारून उत्तम प्रतीचे धान्य देण्याची ठाम मागणी केल्यानंतर अखेर ३९४ क्विंटल निकृष्ट ज्वारी गोदामात परत पाठविण्यात आली. दरम्यान, मेहकर येथील गोदामात आलेला २०० क्विंटल निकृष्ट तांदूळही तपासणीनंतर परत करण्यात आला.

डोणगावात शैलेश सावजी यांचे आंदोलन, मेहकरातून २०० क्विंटल तांदूळही परत
डोणगाव :गोदामांमधून स्वस्त धान्य दुकानांपर्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य पाठविले जात असल्याची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी आक्रमक भूमिका घेत थेट वाटप थांबविले. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारून उत्तम प्रतीचे धान्य देण्याची ठाम मागणी केल्यानंतर अखेर ३९४ क्विंटल निकृष्ट ज्वारी गोदामात परत पाठविण्यात आली. दरम्यान, मेहकर येथील गोदामात आलेला २०० क्विंटल निकृष्ट तांदूळही तपासणीनंतर परत करण्यात आला.
मागील तीन महिन्यांपासून डोणगाव परिसरासह मेहकर तालुक्यातील काही भागात निकृष्ट दर्जाचे तांदूळ व ज्वारी वाटप सुरू असल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे रेशन दुकानदारही मालाची गुणवत्ता तपासल्याशिवाय उचल करून त्याचे वाटप करीत असल्याचे चित्र आहे. परिणामी, गोरगरिबांना गुरेढोरेही न खाणारे धान्य खावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे गोडाऊन व्यवस्थापक व पुरवठा यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
माहिती मिळताच थेट वाटप बंद
२६ डिसेंबर रोजी डोणगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट ज्वारीचे वाटप सुरू असल्याची माहिती मिळताच शैलेश सावजी यांनी तत्काळ तेथे धाव घेत वाटप थांबविले आणि आंदोलन सुरू केले. याआधीच २५ डिसेंबर रोजी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून उत्तम दर्जाचे धान्य देण्याची मागणी केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी वाटप सुरूच राहिल्याने सावजी यांनी संतप्त होत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व पुरवठा अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉलद्वारे परिस्थिती दाखविली.
अखेर प्रशासनाला हालचाल करावी लागली आणि ३९४ क्विंटल निकृष्ट ज्वारी परत घेण्यात आली. याचवेळी मेहकर येथील गोदामात आलेला २०० क्विंटल तांदूळ निकृष्ट असल्याची खात्री करून तोही परत पाठविण्यात आला.
‘चांगला माल कुठे जातो?’ – गोडाऊन व्यवस्थापकांचा सवाल
डोणगाव येथील गोडाऊन व्यवस्थापक मेश्राम यांनी सांगितले की, आम्ही रेशन दुकानदारांना चांगल्या प्रतीची ज्वारी दिली आहे. माल खराब असता तर दुकानदारांनी तो घेतलाच नसता. डोणगावात वाटप झालेली निकृष्ट ज्वारी रेशन दुकानदारांकडे कोठून आली, याचा सखोल तपास पुरवठा विभागाने करणे आवश्यक आहे. जर गोडाऊनमधून चांगला माल जात असेल, तर तो नेमका कुठे गायब होतो याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘गोरगरिबांची थट्टा सहन करणार नाही’ – सावजी यांचा इशारा
डोणगाव व परिसरात वाटप झालेला निकृष्ट रेशन माल गुरांनाही खाण्यायोग्य नाही. शासनाने हा माल तातडीने परत घेऊन त्याऐवजी दर्जेदार धान्य द्यावे. अन्यथा, गोरगरिबांची थट्टा करणाऱ्या या व्यवस्थेविरोधात तीव्र आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा शैलेश सावजी यांनी दिला.

