Sangharsh Jyot: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मातृतीर्थ सिंदखेडराजा ते गोपीनाथगड, परळी या दरम्यान भव्य ‘संघर्ष ज्योत यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. १२ डिसेंबर रोजी ही पारंपरिक आणि उत्साहवर्धक यात्रा पार पडणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष ज्योत समितीच्या वतीने डॉ. सुनील कांयदे यांनी केले आहे.

सहभागी होण्याचे डॉ. सुनील कांयदे यांचे आवाहन
गजानन भालेकर
धोत्रा नंदाई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मातृतीर्थ सिंदखेडराजा ते गोपीनाथगड, परळी या दरम्यान भव्य ‘संघर्ष ज्योत यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. १२ डिसेंबर रोजी ही पारंपरिक आणि उत्साहवर्धक यात्रा पार पडणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष ज्योत समितीच्या वतीने डॉ. सुनील कांयदे यांनी केले आहे.
डॉ. कांयदे यांच्या पुढाकारातून दरवर्षी ही संघर्ष ज्योत मोठ्या उत्साहात काढली जाते. यात्रेची सुरुवात मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊंना अभिवादन करून होते. इतिहास, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणारी ही ज्योत अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी मानली जाते.
गोपीनाथगड येथे पोहोचलेल्या संघर्ष ज्योतीचे स्वागत दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे तसेच माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहील, ज्यातून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरील जनतेचा प्रेमभाव दिसून येतो.
यंदाची संघर्ष ज्योत अधिक भव्य आणि प्रेरणादायी व्हावी, यासाठी डॉ. कांयदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की संघर्षाच्या आणि कार्यप्रेरणेच्या या पवित्र यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिवादन करावे.
संघर्ष ज्योत : इतिहास, परंपरा आणि प्रेरणेचा अखंड प्रवास
डॉ. सुनील कांयदे यांच्या पुढाकारातून गेल्या अनेक वर्षांपासून ‘संघर्ष ज्योत’ यात्रेचे आयोजन केले जाते. यात्रेची सुरुवात मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊंच्या पूजन-अभिवादनाने होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीशी जोडलेली ही भूमी शौर्य, संघर्ष आणि प्रेरणेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे या पवित्र स्थळावरून निघणारी संघर्ष ज्योत युवकांमध्ये सामाजिक भान, कार्यप्रेरणा आणि ध्येयवाद जागवते.यात्रेदरम्यान हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवक-युवती आणि सर्वसामान्य नागरिक वाहनातून ज्योतीसोबत सहभागी होत असतात.

