Samruddhi Highway : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर डोणगाव (जि. बुलढाणा) येथे अतिरिक्त इंटरचेंज (मध्यबदल केंद्र) मंजूर करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे प्रशांत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रशांत पाटील निवेदन
डोणगाव : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर डोणगाव (जि. बुलढाणा) येथे अतिरिक्त इंटरचेंज (मध्यबदल केंद्र) मंजूर करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे प्रशांत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. सध्या या महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे इंटरचेंज उपलब्ध आहेत.मात्र मालेगाव आणि मेहकर या दोन इंटरचेंजच्या मधील परिसरातील नागरिकांना समृद्धी महामार्ग गाठण्यासाठी तब्बल ७५ किमीचा फेरा मारावा लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अंजनी बु., लोणीगवळी, आंधुड, डोणगाव, बेलगाव, पांगरखेड, गोहोगाव, घाटबोरी तसेच परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिकांना दोन्हीही बाजूंनी ३५ ते ४० किमी अतिरिक्त अंतर कापून महामार्गावर चढावे लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
डोणगावजवळ समृद्धी महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महामार्ग प्रशासनाने मोठी जागा उपलब्ध ठेवली आहे. या ठिकाणी अतिरिक्त इंटरचेंज उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य शासनाकडून अमडापूर (ता. चिखली) ते केनवड (जि. वाशिम) या दोन पदरी रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधींचा खर्च मंजूर असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत हा रस्ता नागरिकांसाठी खुला होणार आहे. मात्र या रस्त्यालगतची गावे समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी डोणगाव येथे इंटरचेंज आवश्यक असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
इंटरचेंज मंजूर झाल्यास हजारो नागरिकांना थेट लाभ मिळून वाहतूक, व्यापार, शेती आणि दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल, असे प्रशांत पाटील यांनी निवेदनात नमूद करून नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे.

