‘TET’ in Buldhana: परीक्षा परिषदेच्यावतीने संपूर्ण राज्यभरात 23 नोव्हेंबर, रविवार रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार, बुलढाण्यातही पेपर 1 आणि पेपर 2 साठी एकूण 10 हजार 664 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. जिल्हा परीक्षा आयोजन समितीच्या सुबद्ध आयोजनात शांततापूर्ण वातावरणात परीक्षा प्रक्रिया पार पडली.

94 टक्के उपस्थिती : शांततापूर्ण वातावरणात पार पडली परीक्षा
बुलढाणा: परीक्षा परिषदेच्यावतीने संपूर्ण राज्यभरात 23 नोव्हेंबर, रविवार रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार, बुलढाण्यातही पेपर 1 आणि पेपर 2 साठी एकूण 10 हजार 664 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. जिल्हा परीक्षा आयोजन समितीच्या सुबद्ध आयोजनात शांततापूर्ण वातावरणात परीक्षा प्रक्रिया पार पडली.
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जिल्ह्यातील ११ हजार २८३ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यानुसार, पेपर क्र.१ साठी ५ हजार ३०८ आणि पेपर क्र. २ साठी ५ हजार ९७५ विद्यार्थी प्रविष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात पेपर क्र. 1 आणि क्र. 2 साठी अनुक्रमे 5 हजार 12 आणि 5 हजार 652 विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता पहिली ते आठवी वर्गांवर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना (टीईटी) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य होते. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यभरात ४ लाख ७५ हजार ६६९ विद्यार्थी प्रविष्ट होते. प्राथमिक शिक्षक पदासाठी पात्रता मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, असे निर्देश जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले होते.
619 परीक्षार्थी गैरहजर
एकूण ११ हजार २८३ परीक्षार्थींपैकी 10 हजार 664 जणांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यापैकी, 619 जण विविध कारणांमुळे गैरहजर होते.
18 केंद्रांवर झाली परीक्षा
शहरातील शिवाजी हायस्कूल, एडेड हायस्कूल, शारदा ज्ञानपीठ, भारत विद्यालय, उर्दू हायस्कूल, सहकार विद्यामंदिर-1 व 2, केंब्रिज स्कूल, पोदार इंग्लिश स्कूल, सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल, प्रबोधन विद्यालय, शाहू इंजिनिअरिंग कॉलेज, पंकज लद्धड इंजिनिअरिंग कॉलेज, गुरुकुल ज्ञानपीठ सागवान, विद्या विकास विद्यालय कोलवड, शिवसाई ज्ञानपीठ सागवान, राजीव गांधी सैनिकी शाळा कोलवड आणि जिजामाता महाविद्यालय येथे परीक्षा पार पडली.
परीक्षार्थींची सखोल तपासणी
परीक्षा केंद्रांवर सिसी कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवरील वर्गात प्रवेश करण्यापूर्वी तपासणी झाली. कुठल्याही प्रकाराचा गैरप्रकार होणार नाही, याची परीक्षा आयोजन समितीने दक्षता घेतली होती.

