Justice Chandrashekhar : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.
राजभवन येथे झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर राज्यपाल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन न्या. चंद्रशेखर यांचे अभिनंदन केले. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, लोकायुक्त न्या. (नि.) विद्यासागर कानडे तसेच राजस्थान, झारखंड, दिल्ली, अलाहाबाद, कर्नाटक आणि मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश व सेवानिवृत्त न्यायाधीश उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी न्या. चंद्रशेखर यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली आणि समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
न्या. चंद्रशेखर : जीवनपरिचय
न्या. चंद्रशेखर यांचा जन्म २५ मे १९६५ रोजी झाला. त्यांनी १९९३ साली दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटर मधून एल.एल.बी. पदवी प्राप्त केली आणि ९ डिसेंबर १९९३ रोजी दिल्ली राज्य बार कौन्सिलमध्ये वकिली व्यवसायासाठी नोंदणी केली.
दिल्ली येथे त्यांनी फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या खटल्यांमध्ये वकिलीला सुरुवात केली. १९ वर्षांच्या वकिली कारकिर्दीत त्यांनी विविध न्यायालयांमध्ये सुमारे ३५०० खटले लढविले, ज्यांपैकी अनेक सर्वोच्च न्यायालयात होते. सर्वोच्च न्यायालयातील १४० निवाड्यांमध्ये ते वकील म्हणून उपस्थित होते.
त्यांनी अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) आणि झारखंड राज्य यांचे सर्वोच्च न्यायालयात स्थायी वकील म्हणून काम केले. याशिवाय बिहार राज्य गृहनिर्माण मंडळ, बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, झारखंड राज्य वीज मंडळ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि इतर अनेक महामंडळे व संस्थांचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले. काही खासगी कंपन्यांचेही ते कायमस्वरूपी वकील होते.१७ जानेवारी २०१३ रोजी त्यांची झारखंड उच्च न्यायालय, रांची येथे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २७ जून २०१४ रोजी तेथेच त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २९ डिसेंबर २०२३ ते ४ जुलै २०२४ या कालावधीत त्यांनी झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले.त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती झाल्यानंतर न्या. चंद्रशेखर यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला आणि आता ते अधिकृतपणे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहेत.०